TOD Marathi

मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde Fadnavis Government) सरकार स्थापन होऊन ४० दिवसांनंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र या मंत्रीमंडळ विस्तारात बच्चू कडू, संजय शिरसाट (Bacchu Kadu, Sanjay Shirsat) यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. तेव्हा शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दुसऱ्या विस्तारात काही लोकांना संधी मिळेल असं म्हटलं होतं. आणि आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीखही ठरली आहे. (Second Cabinet Expansion of Maharashtra Government) त्यामुळे नाराज आमदारांसाठी ही गुडन्यूज आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. मित्रपक्षातील आमदारांमध्येही थोडी नाराजी आहे. असं असताना राज्य विधिमंडळाचं अधिवेशन पार पडल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती आहे.

शिंदे फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार ४० दिवसांनी पार पडला होता. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. १४ ऑगस्टला खातेवाटपही जाहीर झाले. दरम्यान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तसेच खातेवाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच आता १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे.

शिंदे फडणवीस सरकारमध्ये न्याय, अपंग कल्याण या खात्याचं मंत्रिपद तसेच अमरावतीचं पालकमंत्रिपद मिळायला हवं, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना मात्र स्थान मिळालं नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे, ते शब्द पाळतील असंही बच्चू कडू म्हणाले.